केशवराव

                           केशवराव

त्या रात्री झोप लागली नाही आणि ती का लागली नाही याची दप्तरी नोंद व्हावी म्हणून हा लेखन प्रपंच. 
गुरुवार दिनांक 8 ऑगस्ट 2024 रोजी रात्रौ 11. 34 वाजता कणकवलीहून अभय खडपकरचा फोन आला तेव्हा मी अर्धवट झोपेत होतो. रिंग पटकन थांबली तेव्हा अभयचे नाव बघून मी साशंक मनाने त्याला फोन केला तेव्हा अभय म्हणाला  

" सर, एवढ्या उशीरा फोन केल्याबद्दल क्षमा मागतो. नंदू (पाटील)ला फोन केला. तो उचलत नाही. कदाचित शूट करत असेल. पण मला काहीच सुचत नाहीये, म्हणून तुम्हाला केला. सर वाईट बातमी आहे. केशवराव जळून खाक झालं. व्हायरल झालेले व्हिडिओ बघा सर  काहीही उरण्याची शक्यता वाटत नाही "
आणि नंतर तो त्याने केशवरावच्या स्टेजवर केलेल्या सादरीकरणावर बोलत राहिला आणि हळहळत राहिला आणि मी सुन्न होऊन ऐकत राहिलो.

नंतर मी बाबा वर्दम थिएटर्सचा सेक्रेटरी केदार सामंत याला फोन केला. तो म्हणाला सर तुम्हाला झोपेतून उठवून सांगणे बरोबर वाटले नाही. फार क्लेशकारक गोष्ट घडली आहे. 

नंतर मी माझे व्याही आणि रंगकर्मी दिलीप सामंत यांना फोन केला पण तो त्यांनी उचलला नाही. 

बाबा वर्दम थिएटर्सच्या ग्रूपवर ही बातमी पत्रकार बंड्या जोशीने 10.18 वाजताच टाकली होती आणि 10.19 पासून व्हिडिओ यायला सुरुवात झाली होती. पण मी ते पाहिलेच नव्हते. 

केशवरावची धडाडलेली चिता बघून मला माझा बाप मेल्यासारखे दुःख झाले. मन भावनाशून्य झाले आणि आणि भावनाशून्यता ही सुद्धा एक भावनाच असते हे समजले. 

केशवराव हे नाट्यगृह कोल्हापूर येथे असले आणि आम्ही कोकणात कुडाळ येथे रहाणारे असलो तरी अनेक वर्षे आम्हाला सर्वात जवळचे पक्की बांधणी असलेले नाट्यगृह केशवराव हेच होते. 

नंतर कोकणात पक्की नाट्यगृहे झाली पण त्या इमारती काँक्रिटवाल्या, नगरपालिकेच्या अ ब क दर्जाप्रमाणे सरकारी छापाच्या होत्या. त्याच्या आवारात मुन्शिपाल्टीच्या कचरागाड्या, भंगारात निघालेली फायर फायटिंग इंजिन्स हे सुद्धा रसिक प्रेक्षकांचा दर्जा घेऊन नाट्यकलेची जोपासना करत उभे असतात. 

माझे केशवराव या नाट्यगृहावर प्रेम होते. या संस्थानकालीन थिएटरचे बाह्य स्वरूप मर्दानी, देखणे, मराठमोळे आणि राजबिंडे होते. केशवरावच्या काळ्या दगडी भिंतीच्या पार्श्वभूमीवर राजा नाईकने काढलेला माझा आणि चंदू शिरसाट यांचा फोटो माझ्याकडे आहे. मी तो जपून ठेवला आहे. आम्ही दरवर्षी कुडाळच्या मुलांच्या तीन एकांकिका घेऊन कोल्हापूरला येतो. त्यावेळेस मला प्रेक्षागृहात बसल्यावर एक मराठी माणूस म्हणून माझ्यावर छत्रछाया धरुन माझ्यामागे उभ्या असलेल्या नाट्यपरंपरेची आणि वारशाची वेगळीच सुखद जाणीव होत असे जी मला कोणत्याही नाट्यगृहात अनुभवाला आली नाही. 

केशवरावच्या रंगमंचावर गेल्या वर्षी माझा पाच वर्षाचा नातू बालनाट्यातून उभा राहिला. 
पण मला ती संधी मिळाली नव्हती कारण नट म्हणून फारसे काम केलेले नाही आणि ज्या नाटकात केले ती नाटके या नाट्यगृहात झाली नाहीत. त्यामुळे केशवरावच्या प्रेक्षागृहात माझा वावर जास्तकरून असे. या नाट्यगृहाला स्वतःचा असा एक आवाज होता

शनीवारी 3 ऑगस्ट 2024 ला आमच्या बाबा वर्दम थिएटर्सच्या गांधी विरुद्ध सावरकर या नाटकात मला प्रथमच नट म्हणून या रंगमंचावर जाण्याची संधी वयाच्या चौऱ्याहत्तराव्या वर्षी मिळाली. 
तेव्हा मला असे जाणवले... 
खास करून नाटक संपताना माझे शो क्लोजर म्हणून जे आत्मगत होते ते देताना मला असे वाटले की हा आवाज माझा नाही हा थिएटरचा आवाज आहे. दिग्दर्शक केदार सामंत याने माझे कौतुक केले तेव्हाही मी त्याला हेच सांगितले की       
' बाबारे तो सजीव असलेल्या थिएटरचा आवाज होता, माझ्या आवाजाचा दर्जा तेवढा नाही.' 

यानंतर फक्त पाचव्या दिवशी नाट्यगृह भस्मसात झाले तेव्हा नाटक या प्रक्रियेतील एका पुराण पुरुषाला, एका शाश्वत सत्तेला आमच्या बेफिकीर आणि मस्तवाल वृत्तीने आम्ही जिवंत जाळल्यासारखे मला वाटले. 

या नाट्यगृहात नाटक म्हणून सादर झाले ते बाबा वर्दम थिएटर्सचे ' गांधी विरुद्ध सावरकर ' हे शेवटचे नाटक, अशी नोंद इतिहासात व्हावी ही भावना आमच्या दृष्टीने अत्यंत क्लेशकारक आहे. 

प्रेक्षागृहाच्या भिंतीवर दिग्गजांची तैलचित्रे होती ती अस्सल होती की नक्कल हे मला माहित नाही. पण जर ती अस्सल असतील तर ही सुद्धा फार मोठी हानी आहे. कुडाळच्या भूषण जडयेच्या मते त्यातील आबालाल रेहमान या महान चित्रकाराचे तैलचित्र अप्रतिम होते. 

आता हे नाट्यगृह का जळले कसे जळले याचे कायद्याचे सव्यापसव्य करणारे प्रश्न निर्माण होतील. 
पण भावनेच्या प्रश्नाचे काय  हाच तर खरा प्रश्न आहे. 
गांधी विरुद्ध सावरकर या नाटकासाठी मी जेव्हा बसमधून उतरलो तेव्हा खाऊगल्लीच्या दिशेने कोपऱ्यात घडीव दगडांचा एक अप्रतिम जिना मला दिसला. त्याची वास्तुरचना एखाद्या नगारखान्याप्रमाणे होती. त्यावर कोणीतरी विसंगत अशी कॉंक्रिटची गॅलरी केली होती. कशाला ? त्यावर शेवाळ होते. मी आमचे मित्र आर्किटेक्ट राजन जोशींना म्हणालो की तुम्ही सर्वांनी त्या बाबतीत काहीतरी करा. 
पण त्यानंतर पाचव्या दिवशी अखंड केशवरावच निकाली काढण्यात आले. 

तर भावनेचा प्रश्न असा आहे मायबाप सरकार की ॐकेशवायनमःनारायणायनमःवासुदेवायनमः अशा सुरात शाहू फुले आंबेडकर असे पौरोहित्य न करता शाहूमहाराजांसारख्या थोर राजाने हे नाट्यगृह जसे बांधले होते त्यात काडीचाही फरक न करता तसेच बांधून पुन्हा जिवंत करावे आणि महाराजांची स्मृती पुनर्जीवित करावी. ब्रिटिश चोरांची नावे पुसता पुसता एतद्देशीय थोरांची समाजोपयोगी कार्ये पुसू नयेत. 
कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा एक एक करुन पुसून टाकून, कोल्हापूरची गाझापट्टी करू नये. 

इत्यलम!

आनंद वैद्य, कुडाळ
12 ऑगस्ट 2024 
9422381468 





Comments

Popular posts from this blog

हे राम !

आई - 3 - पान्हा कान्हा